July 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ जुलै २०१४

२२ जुलै

गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात.

 



एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. 'ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,' असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, 'तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील.' तरीपण तो ऐकेना, एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? "एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ?" असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरू करी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरूने सांगितले, 'लग्न करू नकोस', तर आपण 'लग्न कधी होईल' म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर 'गुरूला समजतच नाही' असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्‍न करतो.
भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ति भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एकाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे, त्याप्रमाणे, संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे, ते भक्तिला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते.

२०४. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात. पण विषय
मागूनही जो देत नाही, त्यापासून परावृत्त करतो, तो संत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या